कुंड्यांमधली बाग सुरू केली तेंव्हा पहिल्यांदा जी वीस – बावीस झाडं आणली त्यातला एक माझा सोनचाफा. गेली सहा वर्षं तो माझ्या एवढ्याश्या टेरेसवर भरभरून फुलतोय, सुगंधाची लयलूट करतोय. अगदी सुरुवातीला आमच्या समोरची इमारत झालेली नव्हती आणि टेरेसवर भन्नाट वारं यायचं, आणि अश्या वेड्या वार्‍यात हा कसा टिकेल म्हणून मला शंका वाटायची. पण तो नुसता टिकलाच नाही, तर फुलतही राहिला. टेरेसवर पहिल्यांदाच बाग करत असल्यामुळे तिथे मिळणार्यात सूर्यप्रकाशात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात किती फरक पडतो याची सुरुवातीला अजिबात कल्पना नव्हती. पाणी, सूर्यप्रकाश, खत सगळंच अजून शिकत होते मी. पण शिकाऊ माळीणबाईंना सांभाळून घेतलं त्यानं. 

त्याला आलेलं पहिलं फूल, त्याची सुरुवातीची पानं, ही “सुवर्णरेखा” जात आहे, हिची पानं अशीच असतात हे माहित नसल्यामुळे त्या पानांच्या वळलेल्या कडा पाहून माझी काळजी, पहिल्यांदा छाटणी करतानाची धाकधूक, खूप दिवस घराबाहेर राहून आल्यावर घरी आल्यावर अर्ध्या रात्रीसुद्धा बागेत काय चाललंय ते बघण्याची धडपड हे सगळं आज आठवतंय.

बागेत सगळ्यात जास्त गप्पा मी त्याच्याशी मारल्यात,  आणि आपण सांगितलेलं – न सांगितलेलं सगळं त्याला समजतंय याचाही अनुभव घेतलाय! अशीच एकदा एका निर्णयाची मोठी जबाबदारी वाटत होती. सगळं नीट होईल ना याची काळजी होती. अस्वस्थ आणि एकटं वाटत होतं. हे सगळं त्याच्याजवळ व्यक्त केलं, आणि भर उन्हाळ्यात, माझं तसं दुर्लक्षच होत असताना माझ्या एवढ्याश्या झाडाला त्या दिवशी तब्बल वीस फुलं आली! माझं झाड माझ्याशी बोलतं यावर त्या दिवशी माझा ठाम विश्वास बसला.

धाकटं भावंड स्वीकारणार्‍या समजूतदार मोठ्यासारखं त्याने माऊ आल्यावर मला बागेसाठी पूर्वीसारखा वेळ न देता येणंही मान्य केलंय. 
या एका झाडाने मला किती आनंद दिलाय ते शब्दात सांगणं शक्य नाही! इथे ब्लॉगवरच त्याच्या किती पोस्ट आहेत हे आज जाणवलं.

असं सगळं मस्त चाललं असताना एकीकडे एक टोचणी लागून होती … कितीही मोठी कुंडी असली तरी सोनचाफ्याला ती आयुष्यभर पुरणार नाहीये. त्याच्या पूर्ण क्षमतेवढं मोठं होण्यासाठी त्याला मोकळ्या जमिनीत रुजायची संधी मिळायला हवीय. पण झाड मोकळ्या जमिनीत लावताना मला त्याच्याजवळ राहता येणार नाही! त्याला असं घर सोडून दूर पाठवायची मनाची तयारी काही होत नव्हती. दोन – चार ठिकाणी मी झाड लावता येईल का म्हणून चौकशीही केली, पण त्या चौकशीत खरा जीव नव्हताच. आणि एक दिवस अचानक नवर्‍याने सांगितलं – “मी सोसायटीमध्ये विचारलंय. आपल्या इथे खाली झाड लावायला जागा शोधणार आहेत ते.” फार दूर नाही म्हणून आनंद, पण आता खरंच जाणार म्हणून दुःख असं चाललं होतं मग. मग सोसायटीचे लोक येऊन झाड पसंत करून गेले. एक दिवस माळीदादाही झाड बघायला आले. पण तेंव्हा झाडाला भरभरून पालवी आली होती, आणि कळ्याही. हा बहर संपल्यावर झाड हलवू या असं ठरलं, आणि हा बहर कधी संपूच नये असं मला मनाच्या कोपर्‍यात वाटायला लागलं! त्यात त्याच्यासाठी शोधलेली जागा म्हणजे केवडा आणि फणसाचं झाड काढून तिथली मोकळी जागा. मस्त वाढलेला केवडा आणि फणस का तोडायचा? (उद्या असाच माझा सोनचाफा तोडला यांनी तर? सोसायटीचं कुणी सांगावं! 😦 परत शंका!) तो बहर संपलाच शेवटी, पण मग पावसाची दडी, सोसायटीच्या बागेला पाणी पुरवणारी मोटर जळाली अशा विविध कारणांनी त्याचा मला अजून महिनाभर सहवास मिळाला. मग दोन वेळा झाड घ्यायला आलेले माळीदादा घरात कोणी नाही म्हणून परत गेले, आणि अखेरीस झाडाच्या पाठवणीची वेळ आलीच!
दुपारी माऊ झोपलेली असताना इतक्या झटकन नेलं त्यांनी झाड, की मला नीट निरोपही घेता आला नाही. माऊ उठल्यावर तिला सांगितलं, “आपलं झाड गेलं खाली!”
“खाली कुठे?”
“माहित नाही! मला माळीदादा दिसतच नाहीयेत खिडकीतून. आपण शोधू खाली जाऊन.”
“आई ते बघ माळीदादा झाड लावताहेत तिथे खाली!” माऊला दिसले ते बरोब्बर.

अगदी माझ्या खिडकीच्या खाली जागा मिळाली सोनचाफ्याला – लांबून का होईना, पण रोज दिसणार तो मला. अगदी खाली जाऊन गप्पा सुद्धा मारता येतील! टेरेसवरच्या त्याच्या रिकाम्या जागेकडे बघून रिकामंरिकामं वाटलं की फक्त खिडकीतून एकदा खाली बघायचं! 🙂 जीव भांड्यात पडणं म्हणतात ते हेच!

लॉंग विकेंडला घराबाहेर पडायचा काहीच प्लॅन ठरत नाहीये म्हणून हळहळ वाटत होती, पण या वर्षी ताम्हिणीच्या वाटेवरची कारवी फुलली आहे हे मायबोलीवर समजलं, आणि लगेच तिथे जाऊन बघण्याची संधी मिळाली. मुळशीचं पाणी बघण्याच्या नादात “क्विक बाईट्स” ची सांगितलेली खूण दिसलीच नाही, आणि अचानक अगदी रस्त्याच्या शेजारी कारवी येऊन भेटली!

कारवीच्या कळ्या
कारवीची फुलं

आणि ही झुडुपं

रस्त्यालगतचा डोंगराचा उतार कारवीनेच भरला आहे!

इथे पांढरी / गुलाबी कारवीसुद्धा फुलली आहे असं समजलं होतं ती काही दिसली नाही.  कारवीसोबत सोनकी आणि दुसरी रानफुलं होतीच.

कुर्डू

सोनकी

(बहुतेक) निसुर्डी

जांभळी चिरायत

रानपावटा

हा पण भेटला – बघा दिसतोय का तुम्हाला …

दिसतोय का मी?

माऊला कारवीपेक्षा जास्त इंटरेस्ट होता पलिकडे दिसणार्‍या धरणाच्या पाण्यात. म्हणजे फुलं वगैरे ठिक आहे, पण एवढं मोठ्ठं पाणी शेजारी दिसतंय आणि आपण तिथे जात नाही ही कल्पना काही तिला पटत नव्हती 🙂 फुलांना भेटून झाल्यावर मग पाण्याला भेटायला गेलो.

काल अर्धवट पाऊस पडल्याने चांगल्यापैकी उकडत होतं, त्यात सकाळ म्हणण्यापेक्षा दुपारीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे पाण्यात शिरल्यावर खरंच जीव शांत झाला. सगळं हिंडून झाल्यावर, पाण्यात शिरल्यावर जिवाला अजून शांत करायला शाण्यासारखा मस्त पाऊस पण आला!

फुलांचे फोटो काढेपर्यंत मोबाईल नक्की माझ्याजवळ होता. तो पाण्यात शिरण्यापूर्वी नव्हता. उतरतांना गाडीत राहिला असेल म्हणून मी तशीच पुढे गेले होते. परत येतांना भिजल्यामुळे माऊचे आणि तिच्या मैत्रिणीचे कपडे बदलणे वगैरे सोपस्कार करून घाईनेच गाडीत बसलो आणि निघालो. पाच मिनिटांनी आठवलं, मोबाईल कुठे दिसत नाहीये! कुठल्याच फोनला रेंज नव्हती, त्यामुळे कॉल करून बघणं शक्य नव्हतं. तेवढ्यात माऊच्या मैत्रिणीची आजी म्हणाली, “आपण पाण्यात जाताना गाडी ठेवली होती, तिथे पडला होता एक मोबाईल!”

समोरचं काही दिसत नव्हतं एवढा पाऊस, रस्त्यात चहाचे पाट वहायला लागलेले. रस्ता तसा वर्दळीचा. परत फिरून गाडी लावली होती तिथे पोहोचलो, तर खरंच मोबाईल पडलेला मिळाला! पंधरा मिनिटं गाड्या, पायी चालणारे, गुरं यांच्या कुणाच्या पायदळी न जाता, कुणी न उचलता फोन तिथेच रस्त्यात पडलेला होता. आणि आतपर्यंत चिखल भरलेला असूनही चालू होता!!! त्याचं आणि माझंही नशीब फार चांगलं असावं. मोबाईल मिळाल्यावर आधी स्विच ऑफ केला, जमेल तसा चिखल काढला. घरी आल्यावर ड्रायरखाली वाळवला. जरा वेळ इअयरफोन लावल्याचा सिंबॉल दाखवत होता, टाचस्क्रीन झोपलेला होता. पण नंतर झाला सुरळीत चालू! या वेळी पहिल्यांदा नोकिया नसलेला फोन  – सॅमसंग – घ्यायचं धाडस केलं होतं मी … तर नोकियाचा ठोकळा सोडून दुसरा कुठला फोनही मी वापरण्याच्या लायकीचा आहे हे सिद्ध झालं या भटकंतीमधून!!! 🙂



माऊला कुत्री – मांजरं – एकूणातच सगळे प्राणीमात्र खूप आवडतात. म्हणजे टेकडीवर आम्ही मधून मधून फिरायला जातो तर तिथले जवळपास सगळे भुभू आणि त्यांचे ताई / दादा / काका / मावशी लोक तिला ओळखायला लागलेत! तर यंदा तिच्या वाढदिवसाला भुभूंना बोलावलंच पाहिजे असं ठरलं. मग कुणाकुणाला बोलवायचं, कसं करू या याची खलबतं सुरू झाली, प्लॅन ठरला, कार्डबोर्ड आणले, ते कापले, आज्जीने मस्त रंगवले आणि असे एक एक भुभू तयार झाले…

मोठ्ठा भुभू आणि छोटुस्सा भुभू!

हा झोपलाय

यांना आपल्या त्या ह्या पुस्तकातून बोलावलंय …

यांना पण!

आणि हा बुटकू

एवढे सगळे भुभू आल्यावर ते एका जागी कसे बसतील? त्यांच्या खेळण्यामध्ये सगळीकडे पायांचे ठसे उठणारच की! ते कसे करायचे? सोप्पंय! पाय बनवू या, म्हणजे त्याचा ठसा करता येईल!

हा पाय

आणि हा ठसा!

भुभूंना मातीचे पाय घेऊन सगळीकडे बागडायला माऊने मदत केलीय. 🙂
आले बघा सगळे … तय्यार!!!

हुश्श! पुढच्या वाढदिवसाला कुणाकुणाला बोलवायचं बरं? 🙂



गेली काही वर्षं जमेल तसं बाप्पा घरी बनवणं चाललंय. या वर्षीची प्रगती म्हणजे मागच्या वर्षी विसर्जन केल्यावर माती ठेवून दिली होती, तीच वापरली. विसर्जनानंतर मूर्ती विरघळल्यावर एक मातीचा केक तयार झाला होता. तो कुटून, चाळून घेतल्यावर नवी कोरी माती तयार! कुटायला फारसे कष्ट पडले नाहीत. आणि माती भिजायला जास्त वेळ द्यायची तयारी असेल तर माती चाळायची अजिबातच गरज नाही असं नंतर लक्षात आलं. नवीन माती विकत आणण्यापेक्षा ते जास्त सोयीचं आहे मला. तसंही मातीचा पुनर्वापर केला नाही तर बाप्पा इको – फ्रेंडली कसा होणार?


बाप्पा रंगवणं अजून काही मनासारखं जमत नाहीये. पहिल्या काही प्रयत्नात पोस्टर कलर वापरून बघितले. पण मातीच्या मूर्तीवर मला ते फार भडक वाटतात. आणि चंदेरी –सोनेरी रंग वापरले तर त्यांचा तवंग येतो विसर्जनाच्या पाण्यावर. मग मागच्या वर्षी फक्त पांढरा आणि केशरी पोस्टर कलर वापरून बघितले. तेही तितकंसं आवडलं नव्हतं. मी केलेल्या मातीच्या मूर्तीचा पोत बाजारातल्या मूर्तीइतका सुबक नसतो. (बाप्पा, तितकी सुबक मूर्ती करायचा पेशन्स कधी येणार माझ्यात?) पांढरा रंग लावल्यावर मूर्तीचा खडबडीतपणा अजून उठून दिसतो आणि ते नीट गिलवा न करता चुना फासल्यासारखं वाटतं. मग या वर्षी गेरूचा प्रयोग करून बघायचं ठरवलं. बेस म्हणून पांढरा रंग दिला, आणि मग त्यावर गेरू. (काही ठिकाणी गेरूमध्ये खालचा पांढरा मिसळून मार्बल टेक्श्चर आलंय ते आपोआपच.) आधी फक्त दाताला वेगळा रंग द्यायचा विचार होता, पण “डोळे काढच” म्हणून आग्रह झाल्यामुळे शेवटी डोळेपण केले. पांढर्‍या रंगापेक्षा चांगलं वाटलं हे. एकदा न रंगवता तशीच मूर्ती ठेवायची इच्छा आहे. रंगकामात अजून काही पर्याय सुचतोय का तुम्हाला? 


पण बाप्पाला इतका गडद रंग दिल्यावर सजावट कशी उठून दिसणार? मग लक्षात आलं, बाप्पाचा हा रंग मला अगदी सोयीचा आहे – मी सजावट करणार ती खर्‍या पानाफुलांचीच, आणि ती गेरूच्या रंगावर पुरेशी उठावदार दिसणार! 






या वेळी एक गंमत लक्षात आली – माती मळून झाल्यावर पहिल्यांदा मला काही सुचतच नव्हतं. मूर्ती करायला घेतांना आधी कितीतरी वेळ नुसते लाडू वळणंच चाललं होतं. कुठल्या क्रमाने करायची मूर्ती, काय प्रपोर्शन ठेवायचं हे काहीही आठवत नव्हतं. त्यामुळे फर्स्ट ड्राफ्ट आणि बिटा व्हर्जन झाल्याच. आणि बाप्पा बनवल्यावर मी उंदीरमामाला चक्क विसरून गेले होते! तो नंतर बनवला. (उंदीर मामा बघून माऊने सांगितलं, आई आता मी मनीमाऊ बनवणार! :D)
 
या वेळी चक्क बाप्पा चतुर्थीच्या आधी तीन – चार दिवस तयार होता. त्यामुळे ते तीन चार दिवस “आई बाप्पा आलाय का? अजून का झोपलाय तो?” या माऊच्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याचं काम होतं. 🙂      

तर अशी सगळी गंमत करून मग काल बाप्पा आलाय. आता त्याच्या माऊबरोबर गप्पा सुरू झाल्यात. आणि ते बघितल्यावर आपण वेळेवर मूर्ती पूर्ण करू शकलो याचं किती समाधान वाटतंय काय सांगू!

 


आज झोपतांना माऊला म्हटलं, “चल बाप्पाला गुड नाईट करू या. तू बाप्पाला सांग ’मी सारखे कारभार करणार नाही’ म्हणून, मी सांगते, ’माऊला सारखं रागवणार नाही’ म्हणून.”
“नको. आपण बाप्पाला म्हणू या, ’थॅंक यू बाप्पा!’”

 




कधी येणार पाऊस? येणारच नाही का अजून? 
हवामान खातं तर म्हणतंय मान्सूनचा पाऊस संपला. मान्सून किंवा बिगरमान्सून आम्हाला काही फरक पडत नाही हो, पाऊस येऊ देत म्हणजे झालं.
आणि आलाच नाही तर? तर आम्ही वर्षभर दुष्काळाचं फक्त राजकारण करत बसणार का?

गेले काही दिवस जे काही पर्यावरणाविषयी समजून घेते आहे त्याने अस्वस्थ व्हायला होतंय. या वर्षी पाऊस नीट पडला असता तर कदाचित मागे पडलाही असता हा विषय थोडा. या अभ्यासात एक नकाशा बघितला होता. जगभरातली पाण्याची स्थिती दाखवणारा. तो बघून मुळापासून हादरले होते. आणि त्यापाठोपाठ मिळालेल्या माहितीने तर झोप उडवली. 


 काय सांगतो हा नकाशा? जगभरातल्या पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती दाखवली आहे इथे. यानुसार आपल्या देशाचा बहुसंख्य भाग हा “ओव्हरएक्स्प्लॉयटेड” ते “हायली एक्स्प्लॉयटेड” गटात मोडतो. या नकाशावर लोकसंख्येचा नकाशा ठेवून बघितला, म्हणजे संकटाची व्याप्ती लक्षात येईल. आपली भूजलाची पातळी धोकादायकरित्या खालावलेली आहे. वर्षभरात जितकं पाणी जमिनीत जातं, त्यापेक्षा जास्त उपसा आपण करतो आहोत. “माझ्या मालकीच्या जमिनीमध्ये मी माझ्या खर्चाने बोअरवेल काढली, आणि त्यातून मिळवलेलं पाणी मला वाटेल तसं वापरलं. यावर आक्षेप घेणारे तुम्ही कोण?” हा माज आपल्याला परवडणार नाही. याच वेगाने पाण्याचा उपसा होत राहिला तर काही दिवसांनी अपल्याला प्यायला सुद्धा पाणी पुरणार नाही! 

यात पुढची गुंतागुंत म्हणजे आपल्याकडे पाण्याचा जास्तीत जास्त वापर शेतीसाठी होतो. आपल्या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी शेतीचं उत्पन्न वाढायला हवंय, आणि आपण शेतमालाची निर्यातही करतो. म्हणजे शेतीची पाण्याची मागणी वाढत राहणार. एक किलो भात पिकवायला सुमारे ३५०० लिटर पाणी लागते. एक क्विंटल तांदळाची निर्यात म्हणजे तो एक क्विंटल पिकवण्यासाठी वापरलेल्या ३५०० * १०० लिटर पाण्याचीही निर्यात आहे! असं आपणं शेतमाल आणि औद्योगिक उत्पादनतून पाणी “निर्यात” आणि “आयात”ही करतो. याला “व्हर्च्युअल वॉटर ट्रेड” म्हणतात. आपल्या देशाचं ही आयात आणि निर्यात यांचं गुणोत्तर कसं आहे? भयावह!!!

 आधीच जास्त उपसा झालेला आहे आणि ती तूट भरून निघण्याऐवजी आपण पाणी निर्यात करतो आहोत!

मोसमी पाऊस किती पडणार आणि कधी पडणार याचे आपले अंदाज अजूनही पुरेसे विश्वासार्ह आणि उपयुक्त
(actionable) नाहीत. वरचं सगळं पाण्याचं गणित बाजूला ठेवलं तरी आधीच आपल्या शेतकर्‍याची अवस्था बिकट आहे. एकरी उत्पन्नामध्ये आपण जगाच्या मागे आहोत. जमिनीचा कस टिकवणं / सुधारणं हे मोठं आव्हान आहे. नवी जमीन लागवडीखाली आणण्यासाठी उपलब्ध नाही, आहे ती जमीन नागरीकरणामध्ये जाण्यापासून वाचवणं अवघड झालंय. काय करायला हवं अशा वेळी?

एका तज्ञांचं असं मत वाचलं, की आपल्याकडे मान्सून चांगला झाला तर सरासरीच्या ११०% पर्यंत पाऊस पडतो, वाईट झाला तरी ७५% तरी पडतोच. अजिबात पाऊस पडलाच नाही असं होत नाही. आहे ते पाणी नीट वापरलं तर आपल्याला पुरू शकतं. राजस्थानातील राजेंद्रसिंह यांचे “जोहड” चे यशस्वी प्रयोग, पाणी पंचायत अश्या कित्येक चळवळी मिळेल ते पाणी वाचवण्यात, त्याचा सुयोग्य वापर करण्यात यशस्वी झालेल्या दिसतात. पण या प्रश्नाची व्याप्ती बघितली तर हे लोकल प्रयत्न अपुरे वाटतात. आणि प्रत्येकाने फक्त दुष्काळाची थेट झळ लागल्यावरच प्रयत्न करायचे का?

मी हवामानशास्त्र, शाश्वत विकास, शेती यापैकी कुठल्याही क्षेत्रातली तज्ञ नाही. उत्सुकतेतून जे काही वाचलं, त्यातून मला समजलंय ते हे. तुम्ही यातले तज्ञ असाल / यावर प्रकाश टाकणारं काही सुचवू शकत असाल, तर जरूर सुचवा – आपल्याकडच्या शेतीचं अर्थशास्त्र समजून घ्यायचंय मला. परवा ट्रेनने येतांना बघितलं, या दुष्काळातही तर भीमेच्या पात्रात पंप टाकून ऊसाला पाणी फिरवत आहेत. जिथे पाणी आहे तिथे ऊस आहे, जिथे नाही तिथे प्यायलाही पाणी नाही! ऊस केल्याशिवाय आपला शेतकरी जगूच शकणार नाही का? अन्नधान्यासाठी कितीतरी जास्त महत्वाची असणारी गहू, ज्वारी, बाजरी, भात, डाळी पिकवून त्याला पैसा का मिळू शकत नाहीये?

*** 
(Water stress indicator हा नकाशा http://www.unep.org वरून तर Virtual Water Trade हा नकाशा http://temp.waterfootprint.org या संकेतस्थळावरून साभार.)

केवळ नशीब म्हणून वाचले असं कितीतरी वेळा झालंय माझ्या बाबत. अशीच ही मी चौथी पाचवीत असतानाची गोष्ट. रेल्वे कॉलनीतली. रेल्वे कॉलनी म्हणजे एकदम सुस्त परिसर. जुन्या काळात बांधलेले प्रचंड बंगले, त्यांची भली मोठी आंगणं, पुढे – मागे – बाजूला प्रचंड आकाराची (बहुधा निगा न राखलेली) बाग. एका घराचा दुसर्‍याशी संबंध नाही. रस्त्यावरून किंवा गेटमधून घराचं दार सुद्धा नीट दिसणार नाही. संध्याकाळीसुद्धा रस्त्यात फारसं कुणी दिसायचं नाही. आता तर दुपारी अडीच ते साडेतीन मधली वेळ असेल. म्हणजे सगळं शांत शांत. घरात मी एकटीच जागी होते. दोघे भाऊ शाळेत / कॉलेजात, बाबा बाहेर गेलेले. आजी बहुतेक झोपलेली. दार वाजलं. मी जाळीच्या दारातून बघितलं तर एक नऊवारी नेसलेली गावाकडून आल्यासारखी दिसणारी मध्यमवयीन बाई बाहेर उभी.

डॉक्टरांनी प्रायव्हेट पेशंट घेऊ नयेत असा नियम असला तरी कितीतरी डॉक्टर घरी पेशंट बघत, त्यामुळे आईचे पेशंटही डॉक्टरांना भेटायला म्हणून वेळीअवेळी कधीही घरी येत. कधी बरी झालेली एखादी आजीबाई शेतावरनं पिशवीभर ताजी भाजी डॉक्टरीण बाईंसाठी घेऊन येई, कधी कुणी बाळाच्या जन्माचे पेढे-बर्फी घेऊन येई. तपासायला आलेल्यांना “घरी तपासत नाहीत, दवाखान्यात भेटा” म्हणून बोळवण करावी लागे, किंवा असे कुणी भेटायला आलं तर त्यांचा निरोप घेऊन ठेवावा लागे. दारात अनोळखी कुणी उभं असण्यात विशेष काहीच नव्हतं त्यामुळे.

“डॉक्टर नाहीत घरी. आणि घरी तपासत नाहीत त्या.” मी नेहेमीप्रमाणे सांगितलं. “ताई दार उघड जरा.” ती बाई म्हणाली. मी दार उघडलं. “इकडे ये.” तिने माझा हात धरला, आणि एकदम गॅरेजच्या दिशेने मला ती ओढतच न्यायला लागली. गॅरेजचं गेट वेगळं, घराचं वेगळं. गॅरेजच्या रस्त्याला तिने मला नेलं तर घरातून कुणाला दिसणारही नाही. तितक्यात घराचं गेट वाजलं – दवाखान्यातून आई अचानक घरी आली होती. गेटमध्ये कुणीतरी पाहून ही बाई माझा हात सोडून गॅरेजच्या दिशेने पसार झाली. मी गोठल्यासारखी जागीच उभी. किती मूर्ख आणि बावळट आहोत आपण! ही बाई आपल्याला पळवून नेत होती, आणि आपल्याला ते समजलंही नाही … आपण तिला प्रतिकार केला नाही! आई आत्ता आली नसती तर! हे सगळं आईला किंवा कुणाला सांगायचीही लाज वाटली मला!    

“का ग बाहेर का उभी आहेस अशी?” आईने विचारलं.

“काही नाही … बहुतेक पेशंट होती कुणीतरी. गेली.” मी.

“बर. येईल परत.”

आजवर हा प्रसंग कधी कुणाला सांगितला नव्हता. आज लेकीच्या शाळेतल्या आयांच्या ग्रूपवर पुण्यातल्या शाळेचा किस्सा फिरतोय – एक माणूस शाळेच्या दाराजवळ उभा होता, शाळा सुटल्यावर एका मुलाला म्हणाला, “आज तुझी आई नाहीये घरी. तिने मला तुला घेऊन यायला सांगितलंय!” सुदैवाने तो मुलगा शाळेत पळून गेला परत. हाच किस्सा पुण्याच्या अजून एक दोन शाळांमध्ये घडला म्हणे. कसं जपायचं मुलांना? कितीही पढवलेलं असलं, तरी त्या क्षणी मुलाला पळून जायचं सुचेल आणि / किंवा कुणीतरी दुसरं मदतीला येईल अशी आशा करायची आपण! त्यावरून हे आठवलं. आपला मूर्खपणा तेंव्हा मी आईला सांगितला असता तर कदाचित ती बाई सापडलीही असती … कोण जाणे तिच्या बरोबर अजून कोण कोण होतं, माझ्याबाबतचा प्रयत्न फसल्यावर तिने दुसरीकडे पुन्हा प्रयत्न केला का!



भटकंती कितीही आवडली, तरी आपलं गाव, आपली जागा म्हणण्यासारखं, जिथे मला कुणी उपरं म्हणू शकणार नाही असं जगाच्या एका कोपर्‍यात काहीतरी असावं ही माझी एक प्राथमिक गरज आहे. माझ्या मागच्या कित्येक पिढ्या चाकरीसाठी भटकत राहिल्यात. नवर्‍याचीही तीच गत. त्यामुळे मला “आमचं गाव, आमचं शेत, आमचं घर” याविषयी सांगणार्‍या लोकांचा जरा हेवाच वाटायचा. आपण राहतो तेच आपलं गाव. मूळ गावावर जे काय प्रेम करायचं असेल ते त्यावरच करा हे आता कुठे कळायला लागलंय. (वळत नाहीच अजूनही!) पण तरीही रोज बदलणार्‍या, नवे रुपडे घेऊन येणार्‍या महानगराला आपलं म्हणणं थोडं जडच जातं. कितीही ओळखीचं झालं तरी ते बिनचेहर्‍याचं राहतंच. त्यामुळे जिथे सगळं गाव एकमेकाला ओळखतं, आपल्या पानातलं अन्न आपल्या शेतातूनच आलेलं असतं त्या “हरवलेल्या नंदनवना”ची स्वप्नं मला अजूनही पडतात. पावसानंतरच्या दिवसात बाहेरून बघताना ही गावं कितीही रमणीय दिसली तरी पोट भरायची मारामार झाल्यावर इथल्या रहिवाश्यांना यापेक्षा शहरातली झोपडपट्टी बरी म्हणावं लागतं हे माहित असूनही हे वेडं स्वप्न काही विरत नाही. या वेडेपणाची लागण माऊलाही व्हावी अशी इच्छा आहे. मातीची ओळख होणं हा त्यातलाच एक भाग. त्यामुळे ती जेमतेम चालायला लागली तेंव्हापासूनच तिला शेतात कधी घेऊन जाता येईल याचे मनसुबे मी रचते आहे. 

या वर्षी अशी संधी मिळाल्यावर मी तिच्यावर (संधीवर बरं, माऊवर नाही !) झडप न घातली तरच नवल! माऊच्या मैत्रिणीच्या आईने कामाला येणार्‍या मावशी सुट्टी घेऊन भातलावणीला शेतात जाणार म्हटल्यावर त्यांच्या शेतावर जायचं आमंत्रण लावून घेतलं. तिथे जायला माऊ आणि मी अर्थातच एका पायावर तयार!

मधेच येणारी पावसाची सर, जरा दूरवर एकीकडे डोंगर आणि त्यातले धबधबे, वार्‍यावर डोलणारी पायर्‍या पायर्‍यांची भाताची खाचरं, शेजारून वाहणारा ओढा आणि पलिकडे धरणाचं पाणी! दोन्ही पिल्लांनी (आणि आयांनी) भातखाचरातल्या चिखलात, शेजारच्या ओढ्यात आणि सगळ्या प्रवासातच किती धमाल केली हे सांगायलाच नको! हे या छोट्याश्या भटकंतीचे काही फोटो:

आपण पाण्यात डुबुक डुबुक करू या?

भाताची रोपं उपटून झाली, बांधलेले गठ्ठे चिखलातून पळत इकडून तिकडे टाकून झाले. खेकडे बघून झाले.

शेताशेजारचा ओढा

 चहाच्या ओढ्यात खेळावंच लागलं मग!

धरणाच्या पाण्याकडे

 धरणाचं पाणी बघायला जातांना कावळ्याच्या छत्र्या दिसल्या, मासे धरणारा काका दिसला. त्याच्या पिशवीचं इन्स्पेक्शन झालं.

धरणाच्या पाण्यात गाळ आहे, मावशी जाऊ देत नाहीये!

पाणी!

 इथे एक तंबू हवा होता!

 वार्‍यावर डुलणारी भाताची रोपं, आणि झाडाला लागलेल्या कोवळ्या चिंचा!

पेरणीपूर्वी आजोबांनी नांगर धरलाय.

 भात लावणीसाठी शहराकडे पोटापाण्यासाठी गेलेल्या मुलंसुना येतात … पण नांगर धरणं अजूनही अजोबांचंच काम! दुसर्‍या कुणालाच ते जमत नाही / शक्य नाही. आजोबांचे हातपाय चालेनासे झाल्यावर काय? घरोघरी हेच चित्र दिसतंय!


शाळेत सहावी – सातवीला कधीतरी ही कविता होती.
मी तेंव्हा बहुतेक दिवसभर माझ्या घट्ट मैत्रिणीच्या घरीच पडीक असायचे. फक्त जेवायला खायला आणि झोपायला घरी! मैत्रिणीची आई मला तिची चौथी मुलगीच म्हणायची! तिची आई यूपीमधल्या छोट्याश्या गावातली. लहानपणीच लग्न झालेलं. प्रेमळ पण अतिशय परंपराप्रिय सासू, मेहनती, समजदार पण आईच्या कधीही शब्दाबाहेर न जाणारा नवरा – त्याचे वडील अकाली गेल्याने सगळ्या धाकट्या भावंडांची जबाबदारी स्वीकारून स्वतः नोकरी करत त्यांना शिकवणारा. दादा आणि वहिनीला आईवडलांसारखं मानणारे धाकटे दीर. अश्या घरातल्या त्या “आई”ला मी कधी तिच्या नात्यांच्या पलिकडे बघितलेलंच नव्हतं. लग्नाला पंचवीस – तीस वर्षं होऊनही सासूच्या धाकात राहणारी, घरातल्या कामाचा आणि रूढीपरंपरांचा बोजा न पेलवून नेहेमी आजारी आजारी राहणारी ही माझी “दुसरी आई” फार प्रेमळ होती.
एकदा नेहेमीप्रमाणे मैत्रिणीच्या घरी आमचा एकत्र ’अभ्यास’ चालला होता. दोघी मिळून ही कविता म्हणत होतो. मैत्रिणीची आई आमच्या कविता म्हणण्यात सामिल झाली! मराठी – इंग्रजी कविता, सुभाषितं माझ्या आईकडून मी भरपूर ऐकली होती, तिच्या शाळेतल्या, कॉलेजातल्या गमतीजमती ऐकल्या होत्या, तिच्या मैत्रिणींविषयी ऐकलं होतं. शाळेत काय चालतं हे तिला ऐकवलंही होतं. आपली आई ही आई असण्याव्यतिरिक्त घराबाहेर आणि घरातही बरीच काही आहे हे समजत होतं.  मैत्रिणीच्या आईला मात्र मी कधी हातात पुस्तक धरलेलं बघितलं नव्हतं. तिच्या घर-संसारापलिकडे तिला कधी काही अस्तित्व होतं, तीही कधीतरी अल्लड मुलगी होती, शाळेत जात होती, तिथे तिच्या मैत्रिणी असतील, आवडते – नावडते विषय असतील, आवडीच्या, तिला पाठ असलेल्या कविता असतील असं कधी मनातही आलं नव्हतं आमच्या! इतक्या दिवसांच्या सहवासात फक्त त्या एका कवितेपुरती दिसली ती मला. त्या कवितेविषयी, तिच्या शाळेविषयी कधी विचारायचं राहूनच गेलं तिला!

माऊच्या मैत्रिणीला ऍडमिशन द्यायला शाळा उत्सुक नाही. 
 कारण तिची आई नोकरी करते. 
आई नोकरी करते आणि घरात आजी – आजोबा नाहीत, म्हणजे मुलांकडे लक्ष कोण देणार? त्यांचा अभ्यास कोण करून घेणार? आईला मुलांकडे बघायला वेळ नसणारच!
नोकरीवरून आल्यावरचा सगळा वेळ आई फक्त मुलीसाठी देत असेल तरी ती नोकरी करणारी आई. तिला पूर्ण वेळ घरी असणार्‍या आईची सर कशी येणार?
नोकरीवर जातांना मुलीकडे बघायला तिने काही व्यवस्था केली असेल कदाचित, पण तरी ती नोकरी करणारी आईच! 
तिची मुलगी घरी राहणार्‍या आयांच्या मुलींपेक्षा कुठल्याच बाबतीत कमी पडत नसेल, पण तरी ती नोकरी करणारी आईच!
 करियर करण्यात रस असणं (पैसे कमावण्यासाठी नाईलाजाने नोकरी करणारी असेल तर गोष्ट वेगळी … पण करियरची महत्त्वाकांक्षा का बाळगावी तिने!) हा आईचा गुन्हा असावा असं ठरवणारे लोक कमी नाहीत. त्यात “पुढची पिढी घडवणार्‍या” सो कॉल्ड चांगल्या शाळेचाही समावेश असावा!

याच न्यायाने शाळेने पहिला प्रेफरन्स आई-बाबा दोघंही कामधंदा काही करत नसतील तर त्यांच्या मुलांना द्यायला हवा. पालकांना मुलांकडे लक्ष देण्याची दुप्पट संधी!
सद्ध्या मी नोकरी करत नाहीये त्यामुळे शाळेसाठी ऑफिशिअली “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई आहे. मी काम शोधते आहे, त्यानंतर “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई राहणार नाही याची सुदैवाने शाळेला कल्पना नाही. मला नोकरीत ब्रेक हवा होता, तो मी घेतला. पुन्हा काम कसं मिळेल, पैसे कसे कमवायचे, डोक्याला खुराक कसा मिळणार अश्या प्रश्नांना खुंटीवर टांगून माऊला वेळ देणं हा माझा त्या वेळचा व्यक्तिगत चॉईस होता,  आणि माझ्या निवडीवर मी खूश होते. पण आपल्या कृतीचे काय काय अर्थ लोक काढू शकतात हे बघून मी थक्क झालेय! “बरं झालंस नोकरी सोडलीस … पोरांना पाळाणाघरात सोडून कसलं करियर करतात आजकालच्या आया!” असं म्हणून माझं “उदाहरण” दिलेलं पाहिल्यावर, उद्या मी काम सुरू केल्यावर यांच्या प्रतिक्रिया काय असतील म्हणून गंमत वाटतेय. आणि काही विशेष प्रयत्न न करता योगायोगाने माऊच्या शाळेला आपण कसं उल्लू बनवणार याचीही! 🙂  

दोन चार दिवसांपूर्वी “अक्षरधारा” मधून माऊसाठी गोष्टीची ढीगभर पुस्तकं आणलीत … त्यातलंच हे एक. म्हणजे मला माहित आहे, माऊ अजून लहान आहे हे पुस्तक वाचायला, पण फारच छान वाटलं म्हणून घेतलंच मी ते पुस्तक.

आज ते वाचलं, आणि इतकं आवडलं, की पुस्तकावर माऊचं नाव घातलंय म्हणून … नाही तर ते चक्क ढापायचा विचार होता माझा. (“माऊची आई” म्हणून नाव बदलावं का त्या पुस्तकावरचं?) माऊची बरीचशी पुस्तकं मला आवडतात. म्हणजे काहीतली चित्र आवडतात, काहीतल्या गोष्टी आवडतात. काहीतलं सगळंच आवडतं!!! हे असंच वाईट्ट आवडलंय. पुस्तकातली चित्र एकदम गोड्ड आहेत. आणि गोष्टी वाचतांना मला थेट बिम्मची आणि लंपनची आठवण झाली … जोयानाचं विश्व इतकं सुंदर उभं केलं आहे ना इथे … “आजी काय बोलते हे मला कळत नाही. मिनी मांजर काय बोलते ते आजीला कळत नाही. रंग काय बोलतात ते मांजरीला कळत नाही. झाड काय बोलतं ते आभाळाला कळत असेल का?” असं मावशीला विचारणारी ही जोयाना!

 
आता अडचण एकच आहे. कवितामावशीला विचारायचंय, जोयानाच्या गोष्टी अजून सांगतेस का म्हणून. म्हणजे हे एक पुस्तक माऊच्या आईसाठी ठेवलं तरी बाकीच्या जोयानाच्या गोष्टी माऊला वाचायला मिळतील!!!

***
जोयानाचे रंग
लेखिका कविता महाजन
राजहंस प्रकाशन
किंमत ५० रुपये