निर्भयाची घटना घडली, तेंव्हा फक्त धक्का, अविश्वास एवढंच वाटलं होतं, यापलिकडे काही सुचणं शक्यच नव्हतं. त्या घटानेतलं क्रौर्यच इतकं होतं की विचारशक्ती गोठून जावी. हे सगळं घडलं तेंव्हा मी नवी आई होते, लेकीमध्ये पूर्ण बुडून गेलेली. आपल्यासमोरचं हे इवलुसं गाठोडं उद्या मोठं होऊन घराबाहेर पडणार आहे हा विचारही तेंव्हा मनाला शिवलेला नव्हता!
ती दवाखान्यात मृत्यूशी झगडत होती तेंव्हा असंही वाटलं होतं, की हिला लवकर मरण यावं आणि या सगळ्यातून सुटका व्हावी तिची एकदाची. म्हणजे चारित्र्यावर कलंक वगैरे म्हणून नाही, पण यातून ही वाचलीच, तरी काय स्वरूपाचं जगणं वाट्याला येणार तिच्या? अजून एक अरुणा शानभाग म्हणून खितपत पडायचं का हिने? शारीरिक पंगुत्व घेऊन आणि आयुष्यभरासाठी “रेप सर्व्हायव्हर” चा शिक्का घेऊन हिला जगावं लागणार. १६ डिसेंबर २०१२ च्या मागे – पुढे तिला काही अस्तित्वच नाही!
“इंडियाज डॉटर” ही निर्भयाच्या केसची मला तरी अतिशय उत्तम हाताळाणी वाटली. निर्भयाचे आईवडील – सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या त्यांची मुलीच्या भल्यासाठीची धडपड आणि ती गेल्यावरही, तिने काही चूक केलेलं नाही, तिचं नाव का लपवून ठेवावं? हा विचार यामुळे त्यांना खरोखर सलाम करावासा वाटला. त्यांचं बोलणं ऐकल्यावर प्रथमच मनापासून वाटलं, निर्भया जगायला हवी होती. तिला जगायला मिळालं असतं.
सगळ्यात धक्का बसला तो गुन्हेगार (आणि त्यांचे वकील) यांचं बोलणं ऐकून. दिल्लीच्या रस्त्यावर दिसणार्‍या कुठल्याही सर्वसामान्य माणसासारखेच हे दिसतात, बोलतात. विकृत लिंगपिसाटसारखे नाही. त्यांच्या बोलण्यात केल्या गोष्टीचा पश्चात्ताप कुठे दिसला नाही – “दोन्ही हातांनी टाळी वाजते. तिला अद्दल घडवण्यासाठी आम्ही हे केलं. ती निमूट राहिली असती तर ही वेळ आलीच नसती!” असं समर्थनच दिसलं! दिल्लीत शिकत असतांना याच रस्त्यांवरून मी बसने प्रवास केलेला आहे. रात्री आठ वाजताही. फक्त मित्राबरोबरही. फरक इतकाच की बस इतक्या कमी गर्दीची नव्हती, खच्चून भरलेली असायची, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझं नशीब बलवत्तर होतं!  

या गुन्ह्यातला तथाकथित बालगुन्हेगार अजून नऊ दहा महिन्यात उजळ माथ्याने पुन्हा दिल्लीत वावरत असेल या कल्पनेने थरकाप उडाला. तिहार जेलचे मानसतत्ज्ञ म्हणतात, तिहारमध्ये दोनशे दोनशे बलात्कार केलेलेही कैदी आहेत. दोनशे हा त्यांना आठवणारा आकडा. खरा आकडा याहून मोठाही असू शकेल! यातल्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या बलात्कारांसाठी त्यांना शिक्षा झालीय आजवर. बलात्कार झाल्यावर गुन्हेगार सहीसलामत सुटणं ही नेहेमीची बाब, शिक्षा होणं अपवादात्मक. आणि स्त्री समोर दिसली, तर पुरुषाचा हक्कच आहे हा ही भावना. ज्यांच्याकडे पैसे असतात ते पैसे फेकून मिळवतात, आमच्यात धमक होती म्हणून आम्ही पैसे न फेकता उपभोग घेतो हा माज! फाशीच्या शिक्षेने हे संपणारं नाही, मान्य. वृत्ती बदलायला हवी, मान्य. कुठे, कधी, कसं बदलणार हे सगळं? तोवर मुलींनी मुळात जन्मालाच येऊ नये, आलं तर घराबाहेर पडू नये, बाहेर पडल्यास परिणाम निमूट भोगावेत असं म्हणायचं का?


गेल्या पाच – सहा महिन्यांपासून जमेल तसं एका नावाजलेल्या सेवाभावी संस्थेमध्ये थोडं काम करत होते. त्या कामावर आधारित पेपर मांडायला एका सेमिनारला गोव्याला जायची संधी मिळाली या आठवड्यात. मी गावाला जाणार म्हणजे अर्थातच माऊला घेऊन. तिला घेऊन एकटीने एवढा उद्योग करावा का नाही अश्या विचारात होते आधी. पण संस्थेतल्या सहकारी म्हणाल्या, जरूर घेऊन ये तिला. मग ठरवलं, जिवाचा गोवा करूनच यावा!

आजवर माऊला घेऊन केलेले प्रवास तिची गैरसोय होणार नाही असं बघून, शक्यतो तिच्या पेसने असे होते. यावेळी प्रथमच दुसर्‍याने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, धावपळीचा प्रवास होता, आणि माऊचा बाबा सोबत नसणार होता. त्यामुळे पेपर वाचायच्या तयारीपेक्षा मला माऊच्या तयारीची जास्त काळजी होती!
प्रत्यक्ष कॉन्फरन्स माझ्यापेक्षा माऊने जास्त एन्जॉय केली! पंधरा – वीस कॉलेजवयीन दादा-ताई कौतुक करायला + खेळायला, आणि जरा चेंज हवा असेल तर मग मावशी मंडळी … दोन दिवस नुसता कल्ला केला माऊने! “दोन वर्षांच्या लेकीला घेऊन एवढा प्रवास म्हणजे धीराची आहेस तू!” पासून ते “कॉन्फरन्सला लहान मुलांना घेऊन यायला परवानगी असते का?” पर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या तिथे. (यातल्या बहुसंख्य मी कानाआड केल्यात.) 

आजपर्यंत माऊ आणि काम या गोष्टी एकमेकांपासून पूर्ण वेगळ्या ठेवायचा माझा प्रयत्न होता. त्याची काही गरज नाही असं जाणवलं मला. तिच्या सोबत असण्याने मला नक्कीच फायदा झाला – जनरली अनोळखी घोळक्यामध्ये मी फार तोंड उघडत नाही. इथे माऊची आई म्हटल्यावर तोंड बंद ठेवण्याची संधीच नव्हती. तरीही माझ्या दसपट तरी ’नेटवर्किंग’ माऊने केलं असेल कॉन्फरन्समध्ये. आणि तिलाही यातून नवं काही अनुभवण्याची संधी मिळेल असं वाटतंय. माऊचं रोजचं रूटीन पाळणं नक्कीच जमणार नव्हतं हे दोन दिवस, पण रूटीनचा बाऊ केला तर नव्या ठिकाणी, नवे अनुभव घ्यायला मिळणं आणि जुळवून घेता येणं कसं शिकणार? एखाद्या वेळी असं झोपायची वेळ आली तर फार वाईट वाटून घ्यायचं नाही असं ठरवलंय मी!
कारण त्यानंतर असा दंगा करायची संधी मिळते!

आज एक गंमत झाली. एका आजींकडे मी माऊबरोबर गेले होते. त्यांनी मला विचारलं,
“ही तुझीच?”
“हो, माझीच.”
मग जरा वेळाने बोलता बोलता परत, “ही तुझीच?”
मला काही परत आलेल्या या प्रश्नाचा रोख कळला नाही. त्यांना कदाचित “जास्तीची माहिती” ऐकायची असावी असं वाटलं.
“हो. माझीच. Adopted.”
माऊसमोर असा उल्लेख करणं त्या आजींना काही आवडलं नाही. “तिला वाईट वाटेल असं नाही बोलू तिच्यासमोर.” त्यांचा सल्ला.
मला न पटलेला. तिला किंवा मला वाईट वाटावं असं काय आहे adopted असण्यामध्ये? मी तिची जन्मदात्री नसल्याने तिला किंवा मला आज काहीही फरक पडत नाही. पुढेही पडण्याचं कारण नाही. It is just a fact. यात कमीपणा वाटावा / अभिमान वाटावा असं विशेष काहीही नाही. याला विनाकारण लेबल कशाला लावायचं? यात मुद्दाम सांगून जाहिरात करण्यासारखं काहीच नाही, पण तिच्यापासून किंवा कुणापासून लपवून ठेवण्यासारखं तर नाहीच नाही.

कुठल्याही दोन वर्षांच्या उपद्व्यापी लेकीच्या आईइतकीच मी माऊवर कावते. आणि कुठल्याही दोन वर्षांच्या उपद्व्यापी लेकीसारखेच कारभार ती दिवसभर करत असते. आपल्या कुटुंबाविषयीची ही माहिती समजून वाईट वाटून घ्यायची उसंत आहे कुणाला इथे?


कोर्सेरावर कोर्सचं हे नाव बघितलं, आणि ताबडतोब माझं नाव नोंदवलं!
 

“कोर्सेरा” हे माझं मागच्या वर्षात गवसलेलं ताजंताजं प्रेम. मुक्त शिक्षण असावं तर असं! जगाच्या पाठीवर कुठूनही, वाट्टेल त्या विषयावर, आपल्याला सोयीच्या वेळी फुकटात शिकायची सोय करून ठेवलीय त्यांनी. वेगवेगळ्या विद्यापीठांद्वारे इथे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात.  साधारण सहा आठवडे ते बारा आठवडे असा कालावधी एकेका कोर्सचा. मी आतापर्यंत चार तरी कोर्सेस मनापासून पूर्ण केलेत. (दोन तीन कोर्स काही तरी विघ्न येऊन अर्धवट टाकावे लागले, ते आता पुढच्या सेशनला.) आतापर्यंत मी अनुभवलेला तिथे शिकवणार्‍यांचा दर्जा, सहाध्यायींकडून शिकायला मिळणार्‍या गोष्टी आणि ऑनलाईन संवादाची पातळी या सगळ्यानेच मी प्रभावित झाले आहे.
तिथला तेल अवीव युनिव्हर्सिटीचा हा ऑनलाईन कोर्स. आठवड्याला साधारण ३ -४ तासांचा वेळ इथली व्हिडिओ लेक्चर्स बघण्यासाठी आणि माहिती वाचण्यासाठी काढला, तर एकदम अलिबाबाची गुहाच उघडली! झाडांना आपल्यासारखं बघता येतं का, त्यांना ऐकू येतं का, स्पर्शाची संवेदना असते का … एक ना दोन अनेक प्रश्न आजवर मनात होते माझ्या. या आणि अजून कितीतरी प्रश्नांची उत्तरं अतिशय रंजक पद्धतीने या कोर्समध्ये मिळाली. (आणि मनात पुढचे प्रश्न तयार झाले! 😉 ) शाळेनंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्रातही कुठलीही पार्श्वभूमी नसतांनाही मला समजेल अश्या पद्धतीने हे सांगणं म्हणजे खरंच कौशल्याचं काम आहे. तुम्हाला झाडांमध्ये रस असेल तर आवर्जून करा हा कोर्स!!! आणि थोडासा मोकळा वेळ असेल, तर तुमच्या आवडीचे कोर्सेस कोर्सेरावर धुंडाळून तर बघा … केवढातरी खजिना गवसेल!

दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात.

आता छाटणी करायची वेळ झाली, मला आठवतं.
कात्री चालवल्यावर गच्ची एकदम मोकळी मोकळी दिसायला लागते. छाटलेली झाडं एकदम बिचारी वाटायला लागतात. (तरी बरं, झाडांना फांदी कापलेली समजते पण वेदना होत नाही हे शिकले आहे इतक्यातच!) जास्तच कापणी केलीय का आपण? नवी पालवी येईल ना याला पुन्हा? अश्या शंका यायला लागतात.
या शंकांमध्ये मी बुडून गेलेली असते तेंव्हा कधीतरी वठल्यासारख्या दिसणार्‍या म्हातार्‍या फांद्यांवरती हळूच कुठेकुठे हिरवा-गुलाबी शहारा उमटायला लागतो. 
त्याची अशी आश्वासक पालवी झाली की मग माझ्या जिवात जीव येतो!
दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात…
***
(अनघा मारणारे मला. तिच्या एकदम सिरियस, अर्थपूर्ण पोस्टीचं नाव इतक्या फुटकळ पोस्टीला वापरलंय म्हणून … पळा!!! 🙂 )

“मला दहा मुलं आहेत. एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं एकही नाही!” असं ज्यांच्याविषयी त्यांच्या आईने म्हटलंय, त्या दाभोळकर “अजबखान्या”तलं एक आपत्य म्हणजे दत्तप्रसाद. यापूर्वी ‘अंतर्नाद’मध्ये त्यांचे एक – दोन लेख वाचले होते, आणि अजून माहिती करून घ्यायची उत्सुकता होती. आईने “रंग याचा वेगळा” घेऊन दिलं आणि गेले तीन –चार दिवस वाचत असलेलं पुस्तक बाजूला ठेवून, सगळी कामं टाकून या पुस्तकात बुडून गेले होते.  
दत्तप्रसाद दाभोळकर यांनी संशोधक म्हणून मोठं काम केलंय. हौस म्हणून शोधपत्रकारिता केली आहे. एखादा विषय भावला म्हणून त्याचा पाठपुरावा करून त्याविषयी अभ्यासपूर्ण, सुंदर, मूलगामी असं काही लिहिलंय. त्यांच्या भावंडांपैकी नरेंद्र दाभोलकरांनी अंनिसच्या कामाला वाहून घेतलं किंवा मुकुंद दाभोळकरांनी प्रयोग परिवार उभा केला. असं एकाच क्षेत्रात बुडून जाण्याचा दत्तप्रसादांचा पिंड नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर जत्रेत फिरणार्‍या मुलाच्या उत्सुकतेने त्यांनी आयुष्याकडे बघितलंय, वेगवेगळे अनुभव घेतलेत.  
भारताच्या अंटार्टिका मोहिमेविषयीचा आणि एकूणातच भारतातल्या संशोधन क्षेत्राविषयी त्यांचा लेख वाचला आणि मोठ्ठा धक्का बसला. आपल्याकडे संशोधनाचं फारसं काही चांगलं नाही हे मी बाहेरून ऐकून होते, पण परिस्थिती इतकी भीषण असेल याची कल्पना नव्हती. सरकारी संशोधन संस्था, आपल्या उद्योगांमधले संशोधन विभाग या सगळ्या अरेबियन नाईट्समधल्या सुरस कहाण्या इथे वाचायला मिळतात.  
सरदार सरोवर, मोठे विकासप्रकल्प, विस्थापितांचे प्रश्न आणि पर्यावरण याविषयी माझ्या मनात मोठ्ठं कन्फ्यूजन आहे. मला यातल्या सगळ्यांच्याच बाजू बर्‍याच अंशी पटतात आणि नेमकं काय चुकतंय ते सांगता येत नाही. “माते नर्मदे” मी वाचलेलं नाही. (आजवर हे वाचलंच पाहिजे म्हणून कुणी समोर कसं ठेवलं नाही याचं आता आश्चर्य वाटतंय!) नर्मदा प्रकल्पाविषयी दाभोळकर जे म्हणतात त्यात अभिनिवेश दिसत नाही तर  स्पष्ट विचार आणि ठोस उपाययोजना आहेत असं वाटतं, त्यामुळे त्यांचं म्हणणं पूर्ण पटतंय. आता “माते नर्मदे” वाचणं आलं! 
एके काळी विवेकानंदांची पारायणं केल्यावर गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या वाटेला गेलेले नाही. दाभोळकरांनी विवेकानंदाविषयी लिहिलेलं वाचून खूप काही नवं हाती सापडल्यासारखं वाटतंय, पुन्हा विवेकानंद वाचावेसे वाटताहेत, त्यांचं विवेकानंदांवरचं पुस्तक वाचावंसं वाटतंय.  
राजधानी दिल्लीची क्षणचित्रं, १८५७ वरची त्यांची टिप्पणी, १९९० च्या भांबावलेल्या रशियाचा त्यांनी घेतलेला वेध, किंवा त्यांची व्यक्तीचित्रं … या पुस्तकातले त्यांचे लेख वाचून अजून वाचायच्या पुस्तकांची एक मोठी यादी तयार झालीये मनात. एवढं दाभोळकरमय होऊन जाण्यासारखं काय आहे या पुस्तकात? दाभोळकरांची लेखनशैली आवडली, त्यांच्या अभ्यासाला, विचाराला दाद द्यावीशी वाटली हे तर आहेच. पण याहूनही आवडलंय ते त्यांचं जगणं, त्यांची वेगवेगळ्या प्रांतामधली मुक्त मुशाफिरी. ज्या वेळी जे भावलं, ते तेंव्हा जीव ओतून करणं आणि नंतर त्यापासून वेगळं होणं. त्यांना संशोधनक्षेत्र आतून बाहेरून माहित आहे पण त्यातल्या राजकारणात ते नसतात. दिल्ली कशी चालते ते त्यांनी बघितलंय, पण ते ती चालवायला प्रयत्न करत नाहीत. अनेक साहित्यिकांचा त्यांचा स्नेह आहे, स्वतःचं लेखन आहे. ज्ञानपीठसारख्या पुरस्काराचं राजकारण त्यांनी बघितलंय. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळावं म्हणून ते सर्व प्रयत्न करतात, पण स्वतः साहित्यातल्या राजकारणापासून दूर राहण्याचं साधतात. हे जाम आवडलंय!!!
***
रंग याचा वेगळा … दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन
संपादन: भानू काळे
कॉंटिनेंटल प्रकाशन
किंमत ४०० रू.

चेंगिझ खानाविषयी खूप उत्सुकता होती. भारताच्या वेशीपर्यंत तो आला आणि तिथून परत फिरला म्हणून आपण वाचलो – तो नेमका का बरं परत फिरला असेल हे जाणून घ्यायची इच्छा हे एक कारण, आणि हा बाबराचा पूर्वज होता – मुघल साम्राज्यात याच्या युद्धनीतीचा, विचाराचा, कर्तृत्वाचा ठसा कुठे दिसतो का हे तपासून बघायची उत्सुकता हे दुसरं. त्यामुळे ऐतिहासिक कादंबरी असूनही लगेच उचललं हे पुस्तक.
तेराव्या शतकातली मंगोल पठारावरची परिस्थिती माझ्या कल्पनेच्याही पलिकडली. अतिशय खडतर निसर्ग, शिकार आणि पशूपालन यावर गुजराण करणार्‍या भटक्या टोळ्या आणि त्यांच्यामधली न संपणारी वैमनस्य. लढाईत हरलेल्या टोळीतील पुरुषांची सर्रास कत्तल, त्यातली बायका मुले पळावणे, त्यांना गुलाम बनवणे या नेहेमीच्या गोष्टी. आज एका सरदाराच्या आधिपत्याखाली लढणारी माणसं उद्या सहज त्याच्याविरुद्ध लढायला तयार, कारण स्वतःचा आजचा स्वार्थ एवढाच लढण्यामागचा विचार.
लग्न करून नव्या नवरीला आपल्या टोळीकडे घेऊन जाणार्‍या नवरदेवाच्या सोबत्याने वाटेतल्या टोळीच्या सरदाराची खोड काढली आणि त्या सरदाराच्या टोळीने नवरीव्यतिरिक्त सगळ्या प्रवाश्यांना कंठस्नान घातलं. सरदाराने या पळवून आणलेल्या नवरीशी रीतसर लग्न केलं. या सरदाराचा मुलगा तेमजुंग – म्हणजे भविष्यातला चेंगिझ खान. मुलगा तीन वर्षांचा झाला की घोड्यावर मांड टाकायला शिकणार आणि शस्त्र हातात धरता यायला लागलं की शिकारीत आणि लढाईत भाग घेणार ही तिथली परंपरा. शिकार करणं, वाट काढणं, आग पेटवणं, स्वतःचा तंबू उभारणं हे सगळे मुलाच्या शिक्षणातले महत्त्वाचे घटक. तेमजुंग जेमतेम नऊ वर्षाचा असताना त्याच्या वडलांचा मृत्यू झाला, आणि टोळीने त्याच्या आईच्या विवाहाला आक्षेप घेतला आणि तिच्या सगळ्या मुलांना अनौरस ठरवत वडलांच्या वारश्यापासून दुरावलं. कालपर्यंत २० हजारांच्या टोळीचा भावी सरदार म्हणून बघितला जाणारा तेमजुंग अन्नाला मोदात झाला. रोज सगळ्या मुलांना जी काय लहान – मोठी शिकार मिळेल ती आणि आईने दिवसभरात मिळवलेली कंदमुळं यावर गुजराण करायची वेळ त्याच्यावर आली. टोळीतल्या त्याच्या विरोधकांच्या ताब्यात सापडून मरण डोळ्यापुढे दिसत असतांना तो शिताफीने निसटला. काही काळ लपत छपत काढल्यावर पुन्हा त्याच्या शत्रूंना धूळ चारायला उभा ठाकला. या सगळ्या काळात संपूर्ण मंगोल पठार एका राजाच्या आधिपत्याखाली आल्याशिवाय या कायमच्या लढाया संपणार नाहीत आणि मंगोल राज्य उभं राहू शकणार नाही हे तेमजिन समजून चुकला. राजकीय व्यवस्थेबरोबरच त्याला तिथेली टोळ्यांवर आधारित सामाजिक उतरंडही बदलायची होती. हे सगळं बदलण्याचा एकच मार्ग आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता – बळाच्या जोरावर!
तेमजिनचा सगळा इतिहास म्हणजे लढाई –> जिंकल्यास अजून मोठे सैन्य + मालमत्तेत वाढ -> पुढची लढाई -> हरल्यास पूर्ण वाताहात -> पुन्हा सैन्याची जमवाजमव -> पुढची लढाई असं इन्फायनेट लूप आहे. मंगोल हे कसलेले योद्धे होतेच – दिवसचे दिवस ते घोड्यावर काढू शकत. वर्षानुवर्षं टिकणारं वाळवलेलं गाईचं मांस हे त्यांचं युद्धातलं अन्न. प्रत्येक सैनिकाकडे त्याचे घोडे, शस्त्र, पाणी असेच. उपासमारीची वेळ आली तर प्रसंगी स्वतंच्या घोड्याचं रक्त पिऊनसुद्धा जिवंत राहण्याची आणि लढण्याची त्यांची रीत होती. त्यांचे घोडेही मंगोल पठाराच्या खडतर निसर्गात टिकाव धरून राहणारे होते – पाणी नसेल तर बर्फ खाऊनही हे घोडे जगू शकत, बर्फाखालून स्वतःचं अन्न शोधू शकत. मंगोल भटके, त्यांचं घर कायमचं तंबूत, त्यामुळे कुठेही गेलं तरी काही तासात घर उभं राहू शके. लढण्यासाठीच ही माणसं जिवंत राहत असावीत असं वाटतं हे सगळं वाचतांना. अश्या योद्द्यांना तेमजिनने युद्धाची अजून नवी तंत्र शिकवली. उत्तम हेरखातं, जलद निरोप पोहोचवण्याची व्यवस्था आणि निशाण / विशिष्ट बाण याच्या वापरातून सैन्याला संदेश पोहोचवणं ही तंत्र त्याने अतिशय यशस्वीरित्या वापरली.
माणसांची पारख आणि त्यांच्या सेवेचं चीझ करणं ही त्याची खासियत होती. सैन्यासाठी आणि अन्य प्रजेसाठी त्याचे कायदे अतिशय कठोर होते, आणि चुकीला शिक्षा मिळाल्यावाचून राहणार नाही याची लोकांना खात्री होती. त्याचा वेश, अन्न, राहणी सामान्य सैनिकांसारखीच असायची. धर्म, टोळी, सामाजिक पत याच्या निरपेक्ष प्रत्येक माणसाच्या गुणांप्रमाणे त्याला वागणूक देण्यावर त्याचा भर असायचा. “माणसाला सगळ्यात प्रिय असतं ते त्याचं स्वातंत्र्य. पण ते मिळाल्यावरही त्याला एक रीतेपणा जाणवतो. कुणी तो रीतेपणा विसरण्यासाठी देवाच्या भजनी लागतो, कुणी विलासात स्वतःला विसरू इच्छितं, तर कुणी अजून काही. हे रीतेपण भरून टाकेल असं कारण तुम्ही मिळवून दिलंत, तर माणसं जगाच्या अंतापर्यंत तुमच्या पाठीशी उभी राहतील!” हा चेंगिझ खानाचा त्याच्या मुलांना सल्ला.
साठाव्या वर्षी शिकार करतांना जायबंदी होऊन त्यातून चेंगिझ खानचा मृत्यू झाला. मरेपर्यंत त्याने मंगोल पठारावर एकछत्री अंमल आणला होताच, खेरीज चीन, कोरिया, खोरासान, पर्शिया, रशिया एवढे सगळे भाग जिंकलेले होते. मंगोल पठाराला कायद्याचं राज्य मिळालं होतं. त्याच्या मागे या साम्राज्याची भरभराट होत जाऊन त्याचा नातू कुबलाई खान याच्या काळात ते परमोच्च शिखरावर पोहोचलं – सयबेरिया पासून अफगाणिस्तानपर्यंत आणि प्रशांत महासागरापासून ते काळ्या समुद्रापर्यंत त्याची सत्ता होती!
हे सगळं वाचतांना द्रष्टा नेता, नवी समाज रचना निर्माण करणारा, उत्तम शास्ता म्हणून कुठेतरी मनात शिवाजी महाराज आठवतात ना? पण फार मोठा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि तेमजिनमध्ये. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या टोकाची क्रूर कृत्य त्याच्या लढायांमध्ये आणि शांतीकाळातही सहज चालायची. आपल्याला विरोध करणारं शहर जिंकल्यावर शहरातल्या एकूण एक माणसाची कत्तल करून त्यांच्या मुंडक्यांचे डोंगर त्याच्या सेनानींनी उभे केलेले आहेत! हेरात जिंकलं तेंव्हा सतरा लाख – सतरा वर पाच शून्य – इतकी माणसं मारली त्यांनी!!! लढायांनंतरच्या त्यांच्या विध्वंसाची वर्णनं वाचून सुन्न होतं मन.
***
चेंगिझ खान भारतात आला नाही कारण इथलं उष्ण हवामान, अस्वच्छ पाणी आणि वेगळ्या हवामानातले अनोळखी आजार या सगळ्यामुळे त्याने भारतात येण्याचा विचार रद्द केला. उत्तरेकडेचे थंड वारे अडवणार्‍या हिमालयाचे किती उपकार आहेत बघा अपल्यावर ! 
***
पुस्तक वाचून झाल्याझाल्या मनात साठलेली अस्वस्थता इथे सांडली आहे सगळी. सगळे संदर्भ परत तपासून मग पोस्ट टाकण्याइतकाही धीर नव्हता माझ्याकडे! हे सगळं आत्ताच लिहायचं होतं!

खूप दिवसत मी इथे बागेविषयी काही लिहिलेलं नाही. कारण बागेत मी काही केलेलंच नाही पाणी घालण्याखेरीज. पण रोज सूर्य उगवतो, झाडांना प्रकाश देतो. पाऊस पडतो, आणि ती थरारतात. काही ना काही नवीननवीन बागेत घडतच असतं. आपलं लक्ष नसेल, तर तो आपला करंटेपणा. तर जाता जाता ही गंमत बघायला मिळाली मला बागेत –

मागच्या पावसाळ्यात मी पांढर्‍या गोकर्णाच्या बिया लावल्या होत्या, आणि त्याचा मस्त वेल आला होता. त्याच्या बिया पडून या वर्षी आपोआप बाग गोकर्णाने भरून गेली होती. त्यातले तीन चार ठेवून मी बाकीचे काढून टाकले. या तीन – चार वेलांनी गंमत केली.
पहिल्याला अशी फुलं आली:
दुसर्‍याची अशी:
तर तिसर्‍याची अशी!
निळ्या गोकर्णाचा एकही वेल माझ्याकडे नव्हता. मग ही किमया कशी बरं झाली असेल? मागच्या पिढीमध्ये सुप्त राहिलेली गुणसूत्रं आता जागी झाल्यामुळे? का परागीभवन करणार्‍या किड्यांनी-माश्यांनी कुठूनतरी निळी गोकर्णाची फुलं शोधून काढली होती? पांढर्‍या गोकर्णावर निळी शाई कशी बरं सांडली असावी?

या पावसाळ्यात उशीरानेच जांभळ्या गोकर्णाच्या बिया सापडल्या त्या टाकल्यात मी एका कुंडीत. त्याला कुठल्या रंगाची फुलं येतील बरं? 🙂


माऊचा वाढदिवस झाला या आठवड्यात. वाढदिवसाच्या तयारीच्या निमित्ताने आईने आणि मी भरपूर मज्जा करून घेतली. दुपारी माऊ झोपली, की आमचे उद्योग सुरू व्हायचे. ती पण मग कधीतरी हळूच उठून येऊन आम्हाला चकित करायची. माऊपासून सगळ्या गमतीजमती लपवून ठेवणं ही मोठ्ठी कसरत होती!
तिच्या वाढदिवसाला तिच्या मित्रमैत्रिणी तर येणारच होत्या, मग लाडक्या बुक्काला आणि लंबूला पण बोलवायचं ठरवलं आम्ही.
बुक्का तयार झालाय …

आणि लंबूपण निघालाय ! 🙂
बुक्का, लंबूच्या मित्रमैत्रिणी त्यांच्या सोबत आल्याच मग 🙂 उरलेल्या कागदातून खारूताई, चिऊ, मनीमाऊ बनवल्या. रंगीत मॅगेझिनचे आणि घरात सापडलेले दुसरे कागद वापरून फुलं, फुलपाखरं तयार झाली. 
मनीमाऊ आणि खारूताई
एक एक चित्र झाल्यावर पुढच्यात अजून सुधारणा होत होती, वेगळं सुचत होतं. आईने बनवलेल्या मनीमाऊ, खारूताईच्या पुढे पहिले बनवलेला बुक्का बिचारा अगदीच साधासुधा दिसतोय!
 
ही सगळी सजावट:
सजावट
(वरच्या फोटोत मधली लाल फुलं ओळखीची वाटतात? मागच्या दिवाळीतल्या आकाशकंदिलाचे उरलेले तुकडे वापरून केलीत ती 😉 )
 
आलेल्या छोट्या मित्रमैत्रिणींना छोटीशी भेट द्यायला गुंजनच्या ब्लॉगवर आहेत तसे पाऊच पण बनवले मग … सुंदर चित्रांचं म्हणून वर्षानुवर्ष नुसतंच जपून ठेवलेलं कॅलेंडर सत्कारणी लागलं त्या निमित्तने. 🙂

भेटवस्तूंची पोतडी 🙂

फार फार तर अर्धा तासाचं काम, एकदम सोप्पं. 
 
हे सगळं विकत आणून / कंत्राट देऊन कमी कष्टात, सुबक झालं असतं बहुतेक … पण ते करतांना आलेली मज्जा विकत कशी मिळणार? 🙂

 


पुण्याच्या जवळ, जिथे माऊला घेऊन एक दिवस, रात्र धमाल करता येईल अशी जागा शोधत होतो आम्ही. पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर पाऊस पडला म्हणून हॉटेलच्या खोलीत नुसतं बसून रहावं लागलं असं होऊन चालणार नव्हतं, आणि पुण्याजवळच्या तारांकित रिझॉर्टसचे दर बघून तिथे जावंसं वाटत नव्हतं. अशी शोधाशोध चालू असतांना एका रिझॉर्टविषयी अर्धवट माहिती मिळाली. तिथे म्हणे शेत वगैरे होतं, आणि काही अनाथ मुलंही रहायला होती. रिझॉर्ट आणि अनाथालय? हे कॉम्बिनेशन काही पचण्यासारखं वाटलं नाही मला. पण चौकशी तर करून बघावी म्हणून फोन केला. इथला मालक पण गमतीशीरच वाटला. चौकशीला / बुकिंगला फोन केल्यावर चेक इनची वेळ, पैसे कधी भरायचे, आमचं रिझॉर्ट कसं जगात बेश्ट आहे यातलं काहीही सांगायला त्याला वेळच नव्हता. “आमच्याकडे जागा खाली आहे, तुम्ही किती जण, कधी येताय ते एसएमएस करा, मी कसं यायचं त्याचे डिटेल्स पाठवतो.” एवढं बोलून त्याने माझी बोळवण केली. हे कसं यायचं त्याचे डिटेल्स थेट आम्ही जायच्या आदल्या दिवसापर्यंत आलेच नव्हते! मी वैतागून फोन केला, तर याने “तुम्ही कधी येणार म्हणाला होता?” म्हणून विचारलं मला! हे काही खरं दिसत नाही. आपल्याला तिथे जाऊन बुकिंग नाही म्हणून परत यायला लागणार बहुतेक. मामला ठीकठीकच दिसतोय एकूण. मी मनाशी एका फसलेल्या सहलीची तयारी करत होते.

दुसर्‍या दिवशी निघाल्यावर तिथल्या मॅनेजरला फोन केला, त्यानेही “तुम्ही आज रात्री राहणार आहात का” म्हणून विचारलं आणि मी मनाशी म्हटलं, “बहुतेक आज संध्याकाळपर्यंत आपण घरीच.” मस्त पावसाळी वातावरणात चांगल्या रस्त्यावरून आणि अगदी नेमक्या खुणांसह पत्ता मिळाल्याने अजिबात न चुकता आम्ही चाललो होतो. ट्रीप छान होणार आजची अशी पहिली शक्यता वाटली ती एका वळणावर हिला पाहिल्यावर:
कळलावी / ‘अग्निशिखा’
गेली कित्येक वर्षं कळलावीच्या सुंदर फुलांचे फोटो बघून आपल्याला ही कधी भेटणार म्हणून मी तरसत होते. ती सहजच भेटली या वाटेवर!
“रिझॉर्ट”ला पोहोचल्यावर खोली बघितली आणि एकीकडे जीव भांड्यात पडला – माऊच्या उपद्व्यापात तुटेल असं काहीही नव्हतं खोलीत – खरं तर काहीच नव्हतं. दोन गाद्या जमिनीवर घालून चादरी उश्या दिल्या होत्या, आणि एकीकडे जास्तीच्या गाद्या, उश्या, चादरी ठेवलेल्या. बाकी मोठ्ठीच्या मोठ्ठी खोली रि..का..मी!!! तर दुसरीकडे नेमकं काय वाढून ठेवलंय समोर अशी जराशी काळजीही वाटली.
चहा – पोहे घेताघेता समजलं … इथे सुट्टीच्या दिवशी नेहेमी शंभर – दिडशे पर्यंत लोक येतात. आज चक्क कुणीच नव्हतं – फक्त आम्ही तिघं! या जागेला “रिझॉर्ट” म्हणणं तितकं बरोबर नाही. हे इको –फार्म आहे. एकूण शंभरएक एकराच्या परिसरामध्ये सेंद्रीय शेती आहे, गाई, इमू, ससे, घोडे, बकर्‍या, कोंबड्या – बदकं असे प्राणी – पक्षी आहेत, ऍडव्हेंचर स्पॉर्टच्या ऍक्टिव्हिटी आहेत,

बर्मा ब्रिज

आणि शेजारीच एका छोट्याश्या नदीवरचा बांध असल्याने हा परिसर पाऊस चांगला झाला असेल तर पावसाळ्याच्या दिवसात तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो!

गराडे धरणाचं पाणी

कानात वारं शिरलेल्या वासरासारखं माऊने दिवसभर हुंदडून घेतलं इथे. 🙂  

फार्मपासून दीडएक किलोमीटरवर त्या बांधापर्यंत चालत जाता येतं, आणि मस्त पाण्यात खेळता येतं. ही जागा इतकी आवडली, की दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा “आबू बघायला” फेरी झाली आमची. 
बांधार्‍याजवळ
जातांना मोर दिसला, येतांना सुगरण पक्ष्यांची घरबांधणी प्रात्यक्षिकं बघायला मिळाली. 🙂

बांधाच्या वाटेवर खडकाळ माळ असल्याने मस्त रानफुलं भेटली …

दुसर्‍या दिवशी फार्मच्या मालकांची भेट झाली तिथे, आणि थोडा उलगडा झाला या जागेविषयी. हा माणूस मर्चंट नेव्हीमध्ये आहे. अगदीच उधळमाधळ केली नाही तर मर्चंट नेव्हीतल्या माणसाला म्हातारपणी पैशाचा प्रश्न पडू नये. पण सोबतीचा, आजूबाजूला माणसं असण्याचा प्रश्न त्यालाही असतोच. त्यावर तोडगा म्हणून त्यांनी इथे प्रथम वीसएक मुलांचं अनाथालय काढलं. मग उरलेल्या जागेत शेती, जनावरं वगैरे. या अनाथालयाचा खर्च निघावा इतपत पर्यटन हे त्यानंतर आलं. केवळ इथे येऊन गेलेल्या लोकांच्या अनुभवांवरून, कुठलीही जाहिरात न करता जितके लोक इथे येतात तेवढं त्यांना पुरेसं आहे. (यांची वेबसाईट आहे म्हणे, पण सध्या तरी चालत नाहीये.) स्वतः मालक पैश्याच्या मागे नसल्यामुळे इथल्या लोकांच्या वागण्यात कुठेच कमर्शियल विचार दिसत नाही फारसा. हा त्यांचा “रिटायरमेंट प्लॅन” ऐकून वाटलं, इतका शहाणा स्वार्थ सगळ्यांना जमला तर किती छान होईल!

***
हिडन ओऍसिस, सासवडजवळ. (इथून पुरंदर – वज्रगड मस्त दिसतात!)